बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुना राजा येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनेक वर्षे सुखा-दुःखात सोबत राहिलेल्या पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने ७२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम महादू कदम असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, अवघ्या काही दिवसांतच पती-पत्नीचा अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम कदम यांच्या पत्नी कचराबाई कदम यांचे काही दिवसांपूर्वीच दीर्घ आजारपणामुळे निधन झाले होते. अनेक वर्षांच्या संसारवेलीवर या दाम्पत्यामध्ये अतूट जिव्हाळा आणि प्रेम होते. अर्धांगिनीच्या जाण्याने तुकाराम कदम यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पत्नीच्या विरहाचे दुःख त्यांना असह्य होत होते आणि ती गेल्यापासून ते पूर्णपणे एकाकी झाले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
पत्नीच्या निधनामुळे कदम यांच्या घरात आधीच दुःखाचे सावट होते. सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय कचराबाई यांच्या तेराव्याच्या (उत्तरकार्य) कार्यक्रमाची तयारी करत होते. मात्र, पत्नीच्या आठवणी आणि विरहातून तुकाराम कदम स्वतःला सावरू शकले नाहीत. घरात विधीची तयारी सुरू असतानाच, संध्याकाळच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.
तुकाराम कदम हे गावातील अत्यंत शांत, मनमिळावू आणि कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने नातेवाईकांसह मेहुना राजा ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. एकाच कुटुंबावर अवघ्या काही दिवसांच्या अंतराने दोन मोठे आघात झाल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.















Discussion about this post