जळगाव । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर आज दि २९ एप्रिल रोजी सकाळी एका धावत्या क्रूझर गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नुकताच विवाह झालेल्या नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब गुजरात येथून विवाह सोहळा आटोपून आपल्या मूळ गावी अकोल्याकडे क्रूझर गाडीने (एमएच ३० एझेड ४७१०) प्रवास करत होते. धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावाजवळ महामार्गावर आले असताना अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की, गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात नववधू पूजा रवी वागडकर (२२), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि महामार्गावरील प्रवाशांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या गाडीतून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.















Discussion about this post