मुंबई । ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन झाले आहे. किडनीच्या आजारामुळे ते त्रस्त होते. 74 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (26 ऑक्टोबर) अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती आहे त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री शोककळा पसरली आहे.
सतीश शाह यांनी आपल्या अफाट विनोदबुद्धी आणि अनोख्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध व्यंगचित्रपट ‘जाने भी दो यारो’ मधील त्यांच्या अनेक भूमिकांनी त्यांना घराघरात लोकप्रिय केले. त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये ‘हम साथ-साथ हैं’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘कभी हां कभी ना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘ओम शांती ओम’ सारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय सादर करत आपल्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवली.
दूरदर्शनवरही सतीश शाह यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेत त्यांनी साकारलेली इंद्रवदन साराभाई ही व्यक्तिरेखा आजही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक संस्मरणीय कॉमिक रोल्सपैकी एक मानली जाते. याआधी त्यांनी 1984 मधील प्रसिद्ध सिटकॉम ‘ये जो है जिंदगी’ मधून प्रेक्षकांच्या घरात पोहोचत लोकांची मने जिंकली होती. सतीश शाह यांच्या जाण्याने केवळ एक प्रतिभावान कलाकार गमावला गेलेला नाही, तर भारतीय मनोरंजन विश्वाने आपल्या विनोद आणि संवेदनशीलतेचा एक अनमोल खजिना हरवला आहे. त्यांच्या कलाकृती आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील.















Discussion about this post