मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून, आता त्यांनी समर्थकांसह मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो समर्थक मुंबईकडे निघाल्याने प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच या आंदोलनामागे राजकीय शक्ती असल्याची चर्चा सुरू असताना राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यावर भाष्य करत राजकीय चर्चेला आणखी हवा दिली आहे.

शेलार यांनी पत्रकार परिषदेत जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, विद्यमान सरकारवर सातत्याने टीका केली जात असताना यापूर्वीच्या सरकारांनी मराठा समाजासाठी काय निर्णय घेतले, याबाबत जरांगे बोलत नाहीत. याच कारणामुळे आंदोलनाच्या भूमिकेबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचे शेलार यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विविध निर्णय घेतल्याचा दावा शेलार यांनी केला. मराठा समाजासाठी एसीबीसी आरक्षणापासून विविध निर्णय सरकारने घेतले असून, आरक्षण टिकवण्यासाठीही सरकारने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.जरांगे यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता शेलार यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाचा संदर्भ दिला. “या सरकारवरच टीका का केली जाते आणि आधीच्या सरकारांबाबत प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत?” असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
‘राजकारणाचा वास येतो’
जरांगे यांच्या आंदोलनामागे नेमका कोणता राजकीय नेता किंवा पक्ष आहे, याची माहिती आपल्याकडे नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्यात तशी चर्चा असल्याचे सांगत त्यांनी या चर्चेवर जरांगे यांनीच स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले. आंदोलनाच्या भूमिकेत राजकारणाचा वास येत असल्याचेही शेलार यांनी नमूद केले.















Discussion about this post