जळगाव : जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत फेरबदल करण्यात आला असून, तब्बल ३९९ पोलिस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये ४३ पोलिस उपनिरीक्षक (PSI) यांचाही समावेश असल्याने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३४२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत, तर ४० कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदली मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय १७ चालक कर्मचाऱ्यांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिस शिपाई, पोलिस नाईक, हवालदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, महिला कर्मचारी तसेच चालक अशा विविध पदांवरील अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सध्याच्या ठिकाणी पाच वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला होता. शासनाच्या बदली धोरणानुसार अशा कर्मचाऱ्यांना बदलीस पात्र ठरविण्यात येते. त्यानुसार २७ मे रोजी झालेल्या जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत या बदल्यांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रशासनाकडून बदली प्रक्रिया राबविताना कायदा व सुव्यवस्था, स्थानिक गरजा, कामकाजाची कार्यक्षमता आणि प्रशासकीय निकषांचा सखोल विचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, या फेरबदलामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या ठिकाणी जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार असून, विविध पोलिस ठाण्यांच्या कामकाजात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांत बदली झालेले कर्मचारी नव्या ठिकाणी रुजू होणार आहेत.
बदल्यांमध्ये या ४३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश
या बदल्यांमध्ये रवींद्र सूर्यवंशी, राजेश चौधरी, सुनील पाटील, दीपक वाघ, शरद जडे, कन्हैया पाटील, राजेंद्र चव्हाण, अनिल भांडे, मधुकर पालोलेवाल, बाळकृष्ण पाटील, रहमतअली सैय्यद, शंकर पाटील, हेमंत देवरे, बापू वराडे, युवराज नाईक, किशोर चौधरी, प्रकाश महाजन, संजय पाटील, चंद्रकांत खाचणे, रवि नरवाडे, वाहीद तडवी, शेख इस्माईल, जमशेर तडवी आणि दिलीप थोरात यांच्यासह ४३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.














Discussion about this post