कल्याण । कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका पित्याने स्वतःच्याच विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधून समोर आली आहे. या खळबळजनक घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी बापाला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
साखरपुडा मोडला अन् बॉयफ्रेंडशी लग्न केले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील ‘रचना रॉयल’ इमारतीत विनोद वसईकर हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी गायत्री वसईकर हिच्यासाठी वडिलांनी अनेक स्थळे पाहिली होती आणि तिचा एका ठिकाणी साखरपुडाही ठरवला होता. मात्र, गायत्रीने तो साखरपुडा मोडून आपल्या बॉयफ्रेंडसोबत प्रेमविवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे वडील विनोद वसईकर यांच्या मनात तिच्याविषयी तीव्र राग आणि नाराजी होती.
प्रेमविवाह झाल्यानंतर गायत्री काही महिन्यांनी प्रथमच आपल्या माहेरी आली होती. दुपारच्या जेवणानंतर घरात वडील विनोद आणि मुलगी गायत्री यांच्यात याच प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, “माझे काहीही न ऐकता तू लग्न केलेस, मी ते अजून विसरलो नाही,” असे म्हणत विनोदने मुलीशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात विनोदने रागावरचा ताबा सोडला आणि घरात असलेल्या धारदार शस्त्राने गायत्रीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेली गायत्री रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर पोलिसांनी फरार विनोद वसईकर याला ताब्यात घेऊन अटक केली.सध्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून बाजारपेठ पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.














Discussion about this post