सागर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारूच्या सेवनाने मोठी दुर्घटना घडली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने यातील १० मृत्यूंची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेत सुमारे ३५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने गंभीर रुग्णांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज तसेच सागर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बाधित गावांमध्ये प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सागर जिल्ह्यातील नौरोजा आणि घुघरा खुर्द या गावांमध्ये विषारी दारूच्या सेवनाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या गावांमध्ये दारूचे सेवन केलेल्या नागरिकांची तपासणी केली जात असून, लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे.प्राथमिक तपासणीत मृत्यूमागे मेथिल अल्कोहोलच्या सेवनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या काही शवविच्छेदन अहवालांमध्येही मेथिल अल्कोहोल सेवनाचे प्राथमिक संकेत मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस तपासात या प्रकरणाला आता आंतरराज्यीय पुरवठ्याची जोड मिळत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून दारूचा पुरवठा झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, ललितपूरमधील संबंधित नेटवर्कचाही तपास केला जात आहे.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही रुग्णांच्या शरीरावर विषबाधेची गंभीर लक्षणे दिसून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संशयित रुग्णांसाठी बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सहा दारूची दुकाने सील
घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत परिसरातील सहा दारूची दुकाने सील केली आहेत. या दुकानांमधील दारूचे नमुने घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, अवैध दारू विक्री आणि पुरवठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सागरचे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी बाधित गावांमध्ये दाखल झाले असून, त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत तपासाला गती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच अशा घटनांबाबत सरकारची भूमिका ‘शून्य सहनशीलतेची’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post