मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या गटातील तब्बल २२ ते २३ आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे बडे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
…तर ‘ते’ २२ आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील अनेक आमदार सध्या आपल्या राजकीय भविष्याबाबत प्रचंड साशंक आहेत. पक्षातील अंतर्गत नेतृत्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे यांमुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेषतः जे आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक नाहीत, त्यांनी आपला मोर्चा पुन्हा शरद पवारांकडे वळवला आहे. यातील बहुतांश आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि ते आमदार कोणते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावर अजित पवार गटानेही अद्याप मौन बाळगले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार (विलीनीकरण होणार) अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज शरद पवार गटाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “आता दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा विषय पूर्णपणे संपलेला आहे. आमचा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात स्वतंत्रपणे लढणार आहे.”
बैठकीतील निर्णयांबद्दल माहिती देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करून मोठ्या उमेदीने पुढे जाण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आम्ही जनतेचे वेगवेगळे प्रश्न आणि मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत. तसेच, महाविकास आघाडी (मविआ) म्हणून येत्या १५ ऑगस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर दौरे करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
२२ आमदारांच्या प्रश्नावर शशिकांत शिंदेंचे सूचक वक्तव्य
आजच्या बैठकीनंतर जेव्हा प्रसारमाध्यमांनी शशिकांत शिंदे यांना अजित पवार गटाच्या २२ आमदारांच्या संभाव्य बंडाबाबत आणि शरद पवारांच्या संपर्कात असण्याबाबत थेट प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी यावर अत्यंत सूचक वक्तव्य केले. आमदारांच्या नाराजीमुळे अजित पवार गटाला खिंडार पडणार की ही केवळ राजकीय चर्चा ठरणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post