सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. एक भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत कारमधील ८ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेले सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, मर्ढे आणि खटाव परिसरातील रहिवासी आहेत.
अपघातामधील ५ तरुण हे कोरेगावच्या आसगावातील आहेत. तर दोन तरुण हे मर्ढे गावातील आहे. एक तरुण हा खटाव गावातील आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाने मिळून ८ जणांचे मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. ही अपघाताची घटना रात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यांनुसार, कार दरी कोसळल्याची दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. चालकाचं घाटात वळण आल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट खोल दरीत कोसळली. कार खोल दरीत कोसळताना तरुणांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु कोणीही मदतीला धावू शकले नाही. अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे देखील समोर आली आहेत.
मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अंश समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि संदीप काटकर (वय ३५) या तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
तत्पूर्वी, अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर टेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू केले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. अपघातामागील दुर्घटनेचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु स्थानिकांनी आणि मृतांच्या कुटुंबीयांनी घटनेमध्ये शासनाला जबाबदार धरलं आहे. रस्त्यला संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघात झाल्याची भावना व्यक्त केली. मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुबीयांना आर्थिक आधार शासनाने द्यावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.














Discussion about this post