नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीत १५ दिवसांचे उपोषण केल्यानंतर आता मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनाची घोषणा झाल्याने सरकारची धावाधाव सुरू झाली आहे.


जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. कोणत्याही आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना राज्याच्या दृष्टीने योग्य भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांवर सातत्याने टीका केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. फडणवीस आणि शिंदे हे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण’
गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत बावनकुळे म्हणाले की, गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह देशातील मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यामुळे या काळात आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारची कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.















Discussion about this post