जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील अनेक भागांत तापमान आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता असून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज, ८ ऑगस्ट रोजी नाशिक आणि जळगावसह राज्यातील ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी पावसाच्या काळात आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी झाडे, विजेचे खांब आणि मोकळ्या मैदानांचा आसरा घेणे टाळावे.
कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी
यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत उकाडा वाढला होता. त्यामुळे आगामी पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पावसासाठी पोषक हवामान प्रणाली
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
या प्रणालीची पुढील वाटचाल आणि तिची तीव्रता यावर महाराष्ट्रातील आगामी पावसाचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाच्या स्थितीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post