सहरसा (बिहार) : बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. समस्तीपूर–सहरसा (६३३४४) पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे लोट इंजिनासह पुढील डब्यांपर्यंत पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
आगीमुळे घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि दरवाज्यांतून बाहेर उड्या मारल्या. त्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असल्याने सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि रेल्वे प्रशासनाच्या तातडीच्या हालचालीमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल (RPF), स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेमुळे सिमरी बख्तियारपूर स्थानकावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी ६ वाजल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. इंजिनाला आग कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून तपास अहवालानंतरच दुर्घटनेचे खरे कारण समोर येणार आहे.















Discussion about this post