नाशिक : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर समस्येवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनासह संबंधित यंत्रणांवर जोरदार टीका केली. खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांमध्ये नागरिकांचे जीव जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली.
भुजबळ म्हणाले, “नाशिकमध्ये एवढे खड्डे आणि शहराची एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. नुकताच एका लग्नासाठी गेलो असताना रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांचा अनुभव आला. त्यामुळे वाहतूक संथ होते, कोंडी निर्माण होते. पोलिस तरी काय करणार? नगरसेवकही वैतागले आहेत, महापौर काही करू शकत नाहीत. मग हे शहर वाऱ्यावर सोडले आहे का?”
ते पुढे म्हणाले, “या प्रश्नावर तातडीने कारवाई झाली नाही तर हा विषय मी मंत्रिमंडळात आणि मुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहे. पाऊस कमी झाला की खड्डे त्वरित भरले पाहिजेत. पुन्हा खड्डे पडले तरी पुन्हा भरा, पण नागरिकांचे जीव जाण्यापेक्षा दुप्पट काम झाले तरी हरकत नाही.”
खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांतील मृत्यूंसाठी महापालिका आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत भुजबळ यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना समान आर्थिक मदत देण्याची मागणी केली. “एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत दिली असेल, तर अशाच प्रकारे इतर सर्व पीडित कुटुंबांनाही समान मदत मिळाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘गिरीश महाजनांनी लक्ष द्यावे’
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रस्त्यांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगत भुजबळ म्हणाले, “मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. नाशिकचे नाव खराब करण्याचे काम सुरू आहे.”
महापालिकेच्या जबाबदारीची आठवण
अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करत भुजबळ म्हणाले, “अधिकारी फक्त कार्यालयात बसण्यासाठी नसतात. रस्ते, पाणीपुरवठा, बांधकाम यांसारख्या मूलभूत सुविधांची जबाबदारी महापालिकेची आहे. ‘हे माझे काम नाही’ असे म्हणून चालणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने कामाला लागले पाहिजे.”















Discussion about this post