बीडच्या माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे आज एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. गोदावरी नदीपात्रात भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याने नदीत हाहाकार माजला आहे. या बोटीमध्ये अंदाजे ५० ते ६० भाविक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि बोट चालकांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
सध्या पवित्र अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील गोदावरी नदीपात्रातून भाविकांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी बोटीचा प्रवास करावा लागतो.
मात्र, अधिक पैशांच्या हव्यासापोटी बोट चालकांकडून बोटीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रवासी बसवले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. याच बेजबाबदारपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे आज भाविकांची बोट नदीच्या मध्यभागी नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याचे बोलले जात आहे.
२० भाविक सुरक्षित; लहान मुलांसह अनेक जण बेपत्ता
अपघात घडताच नदीकिनाऱ्यावरील नागरिकांनी आणि स्थानिक बोट चालकांनी मदतीसाठी नदीत धाव घेतली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, २० भाविकांना सुरक्षितपणे पाण्याचा बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, बोटीत अंदाजे ६० जण असल्याने उर्वरित ४० हून अधिक भाविक अजूनही बेपत्ता आहेत. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बेपत्ता भाविकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, पोलीस आणि प्रशासकीय पथकांचे रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य) अद्यापही सुरू आहे. पाण्याचा प्रवाह आणि नदीची खोली लक्षात घेता हा अपघात अत्यंत गंभीर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच माजलगावसह बीड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. सुरक्षित बाहेर काढलेल्या भाविकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांनी नदीकिनाऱ्यावर एकच टाहो फोडला आहे.















Discussion about this post