जळगाव । खान्देशातील हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. जबलपूर ते पुणे दरम्यान धावणारी ‘विशेष रेल्वे’ आता केवळ स्पेशल न राहता कायमस्वरूपी नियमित एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. विशेष म्हणजे, खान्देशातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भुसावळ आणि मनमाड स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील आयटी व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांचा पुणे आणि जबलपूरचा प्रवास आता अधिक सुकर आणि हक्काचा होणार आहे.
असे आहे नवीन वेळापत्रक आणि नवीन नंबर
सध्या धावणाऱ्या गाडी क्रमांक ०२१३२/०२१३१ जबलपूर – पुणे विशेष गाडीचे रूपांतर आता नियमित गाडीत झाले असून, या गाड्या नव्या क्रमांकासह धावतील.
गाडी क्रमांक २०१६२ (जबलपूर – पुणे साप्ताहिक एक्सप्रेस) :
प्रत्येक रविवारी (दि. २४ मे २०२६ पासून) जबलपूर येथून दुपारी १३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) सकाळी ०६:२५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक २०१६१ (पुणे – जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस) :
प्रत्येक सोमवारी (दि. २५ मे २०२६ पासून) पुणे येथून सकाळी ११:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) पहाटे ०६:०० वाजता जबलपूर येथे पोहोचेल.
‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर मिळणार थांबा
खान्देश आणि मध्य महाराष्ट्राला थेट कनेक्टिव्हिटी मिळावी यादृष्टीने या एक्सप्रेसला प्रवाशांच्या सोयीचे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी मदन महल, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, बुरहानपूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या स्थानकांवर थांबेल. भुसावळ आणि मनमाड हे मध्य रेल्वेवरील मोठे जंक्शन असल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला याचा थेट फायदा होईल.















Discussion about this post