जळगाव । देशात आणि राज्यात सामान्य नागरिक सध्या इंधनाच्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवू लागल्याने पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या परिस्थितीवरून राजकीय वर्तुळातून तीव्र टीका होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, मागच्या वेळी पेट्रोल डिझेलच्या भावात घसघशीत 3 रुपये वाढवले होते. त्यामुळे लोकांनी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत झोडपून काढले होते. या गोष्टीतून धडा घेत आज पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढवलेले दिसत आहे. आज देशाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल असं दिसतंय. पण शेवटी काय? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भुर्दंड हा सामान्य जनतेला सहन करायचाच आहे, अशी खंत व्यक्त करतानाच चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है, असा खोचक टोला खडसे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
राज्यातील अनेक भागांत इंधनटंचाई; पंपांवर शुकशुकाट तर कुठे रांगा
दरवाढीसोबतच सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धाचा हा अप्रत्यक्ष फटका असल्याचे बोलले जात आहे. इंधन कंपन्यांकडून अपुरा पुरवठा होत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.















Discussion about this post