तामिळनाडूच्या राजकारणातील सत्तास्थापनेचा पेच आता अधिकच गुंतागुंतीचा आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरत आहे. राजकारणातील दोन कट्टर शत्रू मानले जाणारे डीएमके (DMK) आणि एआयडीएमके (AIADMK) हे पक्ष अभिनेता विजय यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या प्रस्थापित पक्षांच्या हालचालींना थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने सडेतोड उत्तर दिले असून, दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आपल्या सर्व १०७ आमदारांचा सामूहिक राजीनामा देण्याचा आक्रमक पवित्रा ‘टीव्हीके’ने घेतल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूच्या इतिहासात कधीही न घडलेली ही अभूतपूर्व राजकीय घडामोड घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तामिळनाडूत कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे डीएमके आणि एआयडीएमके थलपती विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. एआयडीएमकेचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी (EPS) आज राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी “आम्हाला पुन्हा निवडणुका नको आहेत” असे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
प्रस्थापित पक्षांच्या या हालचालींविरुद्ध थलपती विजय यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या १०७ आमदारांचा राजीनामा देऊन ते पुन्हा जनतेच्या न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.
थलपती विजय यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एम. के. स्टॅलिन आणि ई. के. पलानीस्वामी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच विजय यांनीही आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतलाय. थलपती विजय यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे तामिळनाडूच्या प्रस्थापित राजकारणाला मोठे आव्हान मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन मोठे पक्ष आपली जुनी शत्रूत्व बाजूला सारून एकत्र येतात का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post