जळगाव : राज्यात सध्या दोन टोकांचे हवामान अनुभवायला मिळत असून, काही भागांत कडक उन्हाचा तडाखा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून अशाच बदलत्या हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.
६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काही काळासाठी दिलासा मिळाला. मात्र, हा गारवा फार काळ टिकणारा नसल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभर जिल्ह्यात कडक ऊन कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होऊन दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, मे महिन्याच्या उत्तरार्धात हवेत मोठे बदल पाहायला मिळतील. २० मेनंतर जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट होऊन उन्हाळ्याच्या त्रासातून जळगावकरांना दिलासा मिळू शकेल.















Discussion about this post