मुंबई । आज ५ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचे एकूण तीन मोठे निर्णय घेण्यात आले. यात आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा निर्णय, सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता राज्य सरकार चालवणार आहे. महाविद्यालय महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा दुसरा निर्णय
सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आता तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकवले जातील. सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.
आदिवासी विकास विभाग
राज्य सरकारने आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणी वाढ करण्यात आली आहे. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणी वाढ करण्यात आली आहे. यात आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे.















Discussion about this post