नवी दिल्ली : देशभरातील लाखो मोबाईल फोनवर शनिवारी (२ मे) काही सेकंदांसाठी इमर्जन्सी अलर्ट दिसल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र हा कोणताही धोका नसून, केंद्र सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन इशारा प्रणालीची चाचणी घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दूरसंचार विभागाने (DoT) याबाबत आधीच नागरिकांना पूर्वसूचना दिली होती. अशा प्रकारचे चाचणी संदेश मिळाल्यास घाबरू नये आणि त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही करण्यात आले होते.
ही अत्याधुनिक यंत्रणा दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आली आहे. ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’ (CAP) या आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित ही प्रणाली देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे भौगोलिक क्षेत्रानुसार नागरिकांना आपत्तीविषयी तात्काळ सूचना देणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे, पारंपरिक एसएमएससह आता ‘सेल ब्रॉडकास्ट’ (CB) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे एका विशिष्ट भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एकाच वेळी इशारा पाठवता येतो. त्यामुळे आपत्तीच्या काळात विलंब न होता नागरिकांना सतर्क करणे अधिक सोपे होणार आहे.
सध्या देशभरात या प्रणालीची व्यापक चाचणी सुरू असून, तिची अचूकता आणि कार्यक्षमता तपासली जात आहे. या कालावधीत नागरिकांना इंग्रजी, हिंदी तसेच विविध प्रादेशिक भाषांमध्ये अशा सूचना मिळू शकतात. भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.















Discussion about this post