नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्याचे ‘पोल्ट्री हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूर तालुक्यात पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील सहा पोल्ट्री फार्ममधील दीडशे ते दोनशे कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाने पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता नवापुरात युद्धपातळीवर ‘कलिंग’ (कोंबड्या नष्ट करणे) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
भोपाळच्या प्रयोगशाळेतून अहवाल पॉझिटिव्ह
नवापूर परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा अचानक मृत्यू सुरू झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी तात्काळ भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या (NIHSAD) प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या तपासणीत कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.
बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह येताच नंदुरबार जिल्हा प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. संसर्ग रोखण्यासाठी बाधित क्षेत्राच्या १ किलोमीटर परिघातील पोल्ट्री फार्ममधील सर्व कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या व बाधित क्षेत्रातील सर्व कोंबड्यांना सामूहिकरीत्या नष्ट केले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा:
“कलिंग प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वारंवार येणाऱ्या या संकटामुळे नवापूरमधील पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. एका बाजूला प्रशासन संसर्ग रोखण्यासाठी कोंबड्या नष्ट करत आहे, तर दुसरीकडे डोळ्यांदेखत लाखो रुपयांचे भांडवल मातीत मिसळताना पाहून पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आता बाधित शेतकऱ्यांना आणि पोल्ट्री चालकांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी आर्त मागणी व्यवसायिकांकडून केली जात आहे.















Discussion about this post