जळगाव | केंद्र सरकारमार्फत जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) वर्ष २०२७ करिता पात्र मान्यवरांच्या नावांचे नामांकन/शिफारसी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 31 जुलै, 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसाठी नामांकन व शिफारशी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे.
पद्म पुरस्कारांकरिता नामांकन/शिफारस सादर करताना केंद्र शासनाचे पुढील महत्त्वाचे निकष विचारात घ्यावेत :
संबंधित व्यक्तीचे कार्य “Excellence Plus” या निकषांनुसार अत्युच्च दर्जाचे असावे. त्या उल्लेखनीय कार्यात समाजसेवा हाही एक घटक असणे आवश्यक आहे. पद्म पुरस्कार हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असल्याने मान्यवरांची शिफारस करताना संबंधित व्यक्तीस यापूर्वी राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत का, याचीही नोंद घ्यावी. पुरस्कारासाठी नावे सुचविताना समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, महिला, दिव्यांग व कमकुवत घटकांमधील प्रतिभासंपन्न व्यक्तींचाही विचार व्हावा.
मरणोत्तर पुरस्काराची शक्यतो शिफारस करु नये. तथापि, उच्चतम गुणवत्तेच्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये जानेवारी २०२६ नंतर निधन झालेल्या व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो. त्यापूर्वी निधन झालेल्या व्यक्तींच्या शिफारसी सादर करू नयेत.
पद्म भूषण पुरस्कारासाठी मान्यवरांची शिफारस पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्यानंतर ५ वर्षांनी करता येईल, तसेच पद्म विभूषण पुरस्कारांसाठी मान्यवरांची शिफारस पद्म भूषण प्राप्त केल्यानंतर ५ वर्षांनी करता येईल. तथापि ही मर्यादा अपवादात्मक प्रकरणांमध्ये शिथील करण्याचा विचार करता येईल.शासकीय सेवेतील तसेच सार्वजनिक उपक्रमातील डॉक्टर व वैज्ञानिक वगळता अन्य कर्मचारी अधिकारी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत.
उपरोक्त निकषांच्या आधारे शिफारस योग्य असतील असे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शिफारस सादर करावी, दिनांक ३१ जुलै, २०२६ नंतर पोर्टलवर नामांकन/शिफारस स्विकारण्यात येणार नाहीत. असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.














Discussion about this post