राज्यात यंदा एप्रिल महिन्यातच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) १४ एप्रिलपासून राज्याच्या विविध भागांत सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला असून, कोकण पट्ट्यात दमट वातावरणामुळे नागरिकांची दमछाक होत आहे.
विदर्भ आणि मराठवाडा: तापमानाचा भडका
विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अकोला येथे तापमानाने ४३ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येत्या १५ एप्रिलनंतर या भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या तापमान ३८ ते ४२ अंशांदरम्यान असून, १६ एप्रिलपासून ते ४३ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्र: प्रखर सूर्यप्रकाश
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये कोरड्या हवामानामुळे उष्णतेचा जोर वाढला आहे. येथे तापमान ३८ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून, पुढील दोन दिवसांत यात आणखी २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा भागात आकाश स्वच्छ असल्याने सूर्यकिरणे अधिक तीव्र जाणवत आहेत. सांगली आणि सोलापूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका असल्याने नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण आणि मुंबई: उकाडा वाढला
मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात तापमानापेक्षा ‘ह्युमिडिटी’ (दमटपणा) अधिक असल्याने अस्वस्थता वाढली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात तापमान ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान असले तरी दमट हवेमुळे प्रचंड घाम आणि थकवा जाणवत आहे.
दरम्यान, जळगावात मागच्या २४ तासात तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी जळगावचे तापमान ४२.१ अंश इतके होते. या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले असून आगामी काही दिवस जळगावकरांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.















Discussion about this post