जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व खडका परिसरात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून चेतन दिलीप जंगले (२५, रा. खडका) या तरुणाला नराधमांनी बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढली, तसेच गळा आवळून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, खडका येथील चेतन जंगले याने शहरातील एका १८ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केला होता. दोघेही एकाच समाजाचे असूनही मुलीचे नातेवाईक या लग्नामुळे प्रचंड संतप्त होते. शुक्रवारी (२० मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास चेतन आपल्या पत्नीसह मामा संतोष महाजन यांच्याकडे (सुहास हॉटेल परिसर) थांबला होता.यावेळी मुलीचे काका मनोज पाटील, मावशी रुपाली ऊर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील आणि इतर १० ते १२ जणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी सुरुवातीला चेतनच्या मामाला धमकावून बाजूला केले आणि त्यानंतर चेतन व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली.
आरोपींनी चेतनला पकडून रुमालाने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.अखेर स्थानिक नागरिकांनी धडाडी दाखवत चेतनची सुटका केली. या हल्ल्यात चेतनचा हात मोडला असून त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत कोमल पाटील, हेरंब चौधरी, संजय बढे, विजय पाटील आणि ज्ञानेश्वर भोई या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. “अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून माणुसकीला काळिमा फासणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे,” असे पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post