नाशिक । दिवाळीचा सण जवळ आल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र याच दरम्यान मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून दिवाळी आणि छठपूजेसाठी घरी निघालेले तिघे युवक खाली पडल्याचा भीषण प्रकार नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी रात्री घडला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक प्रवाशी गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी रात्री कर्मभूमी एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकावर न थांबता पुढे गेल्यानंतर ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी रेल्वे विभागाशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी सुटल्यावर थोड्याच वेळात जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळील ढिकले नगर परिसरात तिघे युवक रेल्वेखाली पडल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी, हवालदार भोळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 या दरम्यान 30 ते 35 वयोगटातील दोन युवक मृतावस्थेत आढळले, तर तिसरा युवक गंभीर जखमी अवस्थेत सापडला.
जखमी युवकास तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपावलीमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने, गाडीतून पडल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीसाठी मतदानाला निघाले होते, याबाबतचा तपास सुरू आहे.















Discussion about this post