मुंबई । शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नुकतेच रामदास कदम यांच्या आरोपाला ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट कराच, पण त्यासोबत ज्योती रामदास कदम यांनी १९९३ मध्ये जाळून घेतलं की जाळलं? त्याबाबतही नार्को टेस्ट करून चौकशी करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूचेही राजकारण केले जातेय. माणसं चोरली, पक्ष चोरले पण काही झाले नाही.त्यामुळे आता बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण करून उद्धव ठाकरे वाईट असल्याचे दाखवण्याचे काम सुरू आहे. अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी अनिल परब म्हणाले की, “1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने ज्योती कदम यांनी स्वत:ला जाळून घेतले. मात्र, तिने स्वत:ला जाळून घेतले होते की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणे शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी.”
“२०१४ ते २०१९ रामदास कदम मंत्री होते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग मंत्रिपद का घेतले? तुम्ही त्याच वेळी अशा माणसासोबत मी काम करणार नाही असं सांगायला हवे होते. रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणा केला. याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटतं नव्हती. पोरी बाळी नाचवणाऱ्याला उत्तर द्यावं वाटतं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो. त्यामुळं ही जबाबदारी माझ्याकडे होती. 24 तास मी तिथे होतो. त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो,” असेही अनिल परब म्हणाले.















Discussion about this post