पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीने प्रशासनाने आज (शनिवार) सकाळी १० वाजेपासून धरणाचे २२ दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडून तापी नदीपात्रात तब्बल ४९ हजार ५८२ क्युसेक (१४०४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या काही तासांत धरण परिसरात २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पाऊस ७६ मिलिमीटर झाला आहे. वाढत्या आवकेमुळे धरणाची पाणीपातळी २१२.१८० मीटर इतकी झाली असून धरणाची पूर्ण क्षमता २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २८९.०० दलघमी (७४.४८ टक्के) तर जिवंत पाणीसाठा १५६.०० दलघमी (६१.१८ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.
कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग
धरणात येणाऱ्या वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय मुख्य कालव्यातून ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या उजव्या कालव्याचे दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत.
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विविध ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये बऱ्हाणपूर – ५२ मिमी, देडतलाई – ५८.२ मिमी, लखपुरी – ९.४ मिमी, अकोला – ६.४ मिमी, टेक्सा – २७.२ मिमी, एरंडी – ३२ मिमी, गोपालखेडा – ३ मिमी, चिखलदरा – ८२.२ मिमी आणि लोहारा – २१ मिमी असा पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात एकूण ३८८.४ मिलिमीटर, तर हतनूर परिसरात ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
तापी नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व शेतीसंबंधित साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर सिंचन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.















Discussion about this post