मुंबई । राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास देखील अडचणी निर्माण होत आहेत. याच दरम्यान आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास आता २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते.
राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची ३० सप्टेंबर २०२५ रोजी शेवटची मुदत होती. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितलं होतं. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.















Discussion about this post