सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे . विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता या प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, मालवण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित जबाबदार दोघा विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या दाव्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर आता पोलीस, राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती कठोर कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
केतन पाटलांनी आरोप फेटाळले
याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले नव्हते. मी केवळ पुतळ्याच्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होते. शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा कामाचा आणि आपला कोणताही संबंध नाही, असे चेतन पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता ठाण्यातील संबंधित कंपनीवर पोलीस गुन्हा दाखल करणार का, हे बघावे लागेल.















Discussion about this post