जळगाव । जिल्ह्यात अल्पवयीन बालक आता वाहन चालविताना आढळल्यास त्याच्या पालकाला चक्क २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या नवीन नियमाची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्याची किंमत पालकांना चुकवावी लागणार आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलांना वाहन देऊ नये. अल्पवयीन मुलांना वाहन दिल्यास त्यांना वाहतुकीचे नियम माहीत नसतात. अपघातही अनेकदा घडतो. नुकतीच पुणे, अमरावती, जळगाव येथे लहान मुलांच्या हातात चारचाकी, दुचाकी दिल्याने अनेक जण ठार, तर काही जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलांना अपघाताची घटना घडली तर काय करावे? काही करू नये, याचे सारासार ज्ञान नसते. त्यामुळे त्यांना वाहन द्यायला नको.
१ जूनपासून २५ हजारांचा दंड आणि वाहनमालकाची नोंदणी रद्द होणार आहे. शासनाने १ जूनपासून वाहतुकीचे नवीन नियम लागू केले आहेत. यात अल्पवयीन मुलाला वाहन दिल्यास २५ हजारांचा दंड व अन्य कलमांच्या समावेश आहे. त्यामुळे पालकांनीही वेळीच सावध होणे आवश्यक आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे देण्यात आली.















Discussion about this post