पुणे । पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोग आणि महसुलचे अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चुकीची कामे आणि आर्थिक मागणी पुर्ण करत नसल्याने वारंवार तक्रारी केल्या जात असून आता हे सर्व सहन होत नाही, आत्महत्या करण्याची वेळ आलीय, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा आरोप केला आहे. डॉ. सुहास दिवसे यांचे वर्तन राजकीय नेत्यांना अनुकूल आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना त्यांच्या अधिकारात नसताना डॉ. दिवसे यांनी माझे भूसंपादनाचे अधिकार काढून घेतले आहेत. तसेच माझी यापूर्वी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाची चौकशी सुरू असताना स्वतंत्र चौकशी पथक नेमून २८ मे रोजी कोणतीही कल्पना न देता माझ्या आणि खेड तहसीलदार यांच्या कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली.
हे सर्व खेडच्या विद्यमान आमदारांना हाताशी धरून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. खेडचे स्थानिक विद्यमान आमदारांना मी आणि माझे तहसीलदार यांचे काम सुरू ठेवू द्यायचे नाही, म्हणून राजकीय आणि आर्थिक कारणास्तव आमची बदली करायची आहे. त्यामुळे डॉ. दिवसे यांनी अधिकृतपणे काम करण्याऐवजी काही राजकीय व्यक्तींचे मध्यस्थ म्हणून काम करत आहेत, असे गंभीर आरोप कट्यारे यांनी पत्रात केले आहेत.
तसेच माझ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली नाही, तर उद्या माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदर निवडणूक निर्णय आधिकारी आणि प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत. ज्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.















Discussion about this post