मुंबई/जळगाव । राज्यात पूर्व मोसमी पावसाने पाठ फिरवताच सूर्याने आपले रौद्र रूप धारण केले आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर शेजारील अमरावतीतही पारा ४६.८ अंशांवर पोहोचला आहे. तसेच जळगावातही रविवारी तापमानाने यंदाच्या मोसमातील उच्चांक गाठला आहे.
विदर्भात ‘ऑरेंज’ आणि ‘येलो’ अलर्ट
हवामान विभागाने उष्णतेची तीव्रता लक्षात घेता अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी आज (ता. २७) ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागात पुढील काही तास तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच बुलडाणा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला असून, येथील उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.
खान्देशातही स्थिती बिकट आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान रविवारी (दि. २६) ४४°C वर पोहोचले. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा आलेख चढताच आहे. २४ एप्रिलला ४२ अंश, २५ एप्रिलला ४३ अंश आणि २६ तारखेला ४४ अंश अशी सलग वाढ नोंदवली गेली आहे. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीचे तापमानही २८ अंशांपर्यंत गेल्याने रात्रीचा गारवा गायब झाला आहे. घरांमध्ये कूलर असूनही गरम वाफा येत असल्याने नागरिकांना मोठा उकाडा सहन करावा लागत आहे.
वातावरणात का झाला बदल?
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी आकाश ढगाळ असले तरी, उन्हाचा चटका आणि आर्द्रतेमुळे उकाडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे जमिनीवर अडकून राहत असल्याने ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’सारखी स्थिती निर्माण होऊन उष्णता वाढत आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat Stroke) धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसल्यास बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच भरपूर पाणी पिणे, सुती कपडे वापरणे आणि आहारात थंड पदार्थांचा समावेश करणे असे आरोग्य सल्ले देण्यात आले आहेत.















Discussion about this post