कोल्हापूर । ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. अशातच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान घटनास्थळी कडक बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन उसाच्या कांड्या बाजूला केले.
यावेळेस आंदोलकांनी महामार्गावर उसाच्या कांड्या भरलेली पोती टाकून निषेध नोंदवला. एकरकमी एफआरपी आणि साखर कारखानदारांची आडमुठी भूमिका यावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.















Discussion about this post