मुंबई । देशात काही आठवड्यांपूर्वी झालेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) नियमावली अत्यंत कठोर केली आहे. परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा डमी उमेदवार बसू नये, यासाठी यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, परीक्षार्थींना बुरखा, मास्क किंवा टोपी घालून केंद्रात प्रवेश करता येणार नाही. परीक्षेला जाताना आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यापैकी एकाची मूळप्रत सोबत ठेवावी लागणार आहे. परीक्षार्थींकडे मूळप्रत असल्यांशिवाय केंद्रात प्रवेश मिळणार नाही.
यंदा केंद्रात प्रवेश करण्याआधी परीक्षार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने ‘फ्रिस्किंग’ होईल. परीक्षार्थींची हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच परीक्षार्थींची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे.
केंद्रावर परीक्षार्थ्याचे फेस रिकग्नीशन केले जाईल. त्याचबरोबर संशयित परीक्षार्थींची आधार पडताळणीही परीक्षा कालावधीत केली जाईल. परीक्षा केंद्रात मूळ विद्यार्थ्यांऐवजी अन्य परीक्षार्थी प्रवेश केल्याचे आढळल्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य परीक्षा परिषदेने दिलाय. परीक्षा केंद्र आणि परिसर, परीक्षा दालनात सीसीटीव्ही हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत. ‘कनेक्ट व्ह्यू’मध्ये संपर्कासाठी प्रत्येक परीक्षा केंद्र संचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष आणि राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे इंटरनेट फोन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मागील वर्षी घेतलेल्या परीक्षार्थींची नावे आणि छायाचित्रे यंदाच्या परीक्षांमधील परीक्षार्थींसोबत पडताळणी केली जाणार आहे. त्यासोबत एक परीक्षार्थी आणि दोन वेगवेगळी छायाचित्रे किंवा एकच छायाचित्र आणि दोन वेगवेगळी नावे असलेल्या परीक्षार्थींची यादी आहे. तसेच एकाच परीक्षार्थीने वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर अनेक अर्ज भरलेले आहेत. या परीक्षार्थींची यादी परीक्षेपूर्वीच पडताळणीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी, तसेच परीक्षेच्या वेळी येणाऱ्या डमी विद्यार्थ्यांची ओळख तत्काळ करणे शक्य होणार आहे, असे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
परीक्षार्थींना काय सूचना दिल्या?
परीक्षेला जाताना परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड यापैकी एक छायाचित्र ओळखपत्राची मूळ प्रत सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. यंदा प्रथमच प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि क्युआर कोड असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रश्नपत्रिका ही कोणत्याही टप्प्यावर ओळखणे सोपे होणार आहे. परीक्षेत प्रत्यक्षात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेमध्ये अनिवार्यपणे नमूद करावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई असणार आहे.
परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही अनिवार्यपणे वापरणार आहे, त्यामुळे चेहरा स्पष्टपणे दिसण्यासाठी दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही. परीक्षार्थींना दिलेल्या उत्तरपत्रिकांसोबत दोन कार्बन कॉपी असणार आहेत. एक परीक्षार्थींसाठी आणि दुसरी परीक्षा परिषदेची असणार आहे.
दिव्यांग परीक्षार्थींना आता लेखनिक म्हणून कुटुंबातील सदस्य नेण्यास बंदी असणार आहे. दिव्यांग परीक्षार्थीस लेखनिक घ्यायचा असेल, तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे.















Discussion about this post