मुंबई । ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बसभाड्यात सरासरी १३.५६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वाढीव तिकीट दर आजपासून लागू झाले असून आता तिकीट दर ५ रुपयांच्या पटीत आकारले जाणार आहेत.
डिझेलच्या वाढत्या किमती, देखभाल खर्च आणि आर्थिक ताळमेळ साधण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मात्र, मुंबई-पुणे मार्गावरील एसी शिवनेरी आणि शिवशाही बसच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
नव्या दरानुसार ६ किलोमीटरच्या प्रवासासाठीचे किमान भाडे १३ रुपयांवरून १५ रुपये करण्यात आले आहे. महामंडळाच्या नियमांनुसार मूळ भाड्यावर ५.५ टक्के प्रवासी कर वगळून ५ टक्के जीएसटी जोडला जात असून अंतिम तिकीट रक्कम ५ रुपयांच्या पटीत निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळता येतील. तसेच ‘अमृत’ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांकडूनही किमान ५ रुपये तिकीट शुल्क आकारले जाणार आहे.
वर्षभरातील दुसरी मोठी भाडेवाढ
ही गेल्या एका वर्षातील एसटीची दुसरी मोठी भाडेवाढ आहे. यापूर्वीही महामंडळाने जवळपास १५ टक्के भाडेवाढ केली होती. त्याआधी दरवर्षी साधारण ४ ते ५ टक्क्यांपर्यंतच भाडेवाढ केली जात होती.
१ ऑगस्टपासून NCMC कार्ड अनिवार्य
दरम्यान, एसटी महामंडळ १ ऑगस्टपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रणाली सुरू करणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सवलत योजनांच्या लाभार्थ्यांना प्रवासातील सवलती मिळवण्यासाठी NCMC स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य असेल. महामंडळाच्या माहितीनुसार, या योजनेसाठी ६२ लाखांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली असून ३५ लाखांपेक्षा अधिक स्मार्ट कार्ड सक्रिय करण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे तिकीट प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासोबतच सवलत व्यवस्थापनातही पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.















Discussion about this post