आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ ते १६ वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. जेजुरीत पालखी आगमनावेळी भंडाऱ्याची उधळण सुरू असतानाच वारीसोबत असलेला एक ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. धडक इतकी भीषण होती की अनेक वारकरी रस्त्यावर फेकले गेले.
घटनेनंतर स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत झालेल्या तीनही महिला वारकरी सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. टेम्पो अचानक अनियंत्रित कसा झाला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला शोक
या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’वर शोक व्यक्त करत मृत वारकरी भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जखमींची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
रोहित पवार यांची चौकशीची मागणी
आमदार रोहित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत, हा अपघात नेमका कसा घडला याची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. तसेच जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.















Discussion about this post