पुणे | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. “2014 किंवा 2019 मध्ये शरद पवार यांनी एनडीएत प्रवेश केला असता, तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते,” असा दावा आठवले यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, “शरद पवार हे देशातील मोठे आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी त्या काळात एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता, तर त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली असती.”
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. “अजित पवार पक्षात असताना अनेक राजकीय निर्णयांवर चर्चा होत होती. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करण्याबाबतही चर्चा होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील, असे सध्या वाटत नाही,” असे ते म्हणाले.
रामदास आठवले यांनी राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल,” असे त्यांनी सांगितले.
महिला आरक्षण आणि उपवर्गीकरणावर भूमिका
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले यांनी केंद्र सरकारकडे आवश्यक बहुमत असल्याचा दावा केला. त्यामुळे महिला आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया पुढे जाईल आणि भविष्यात महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने यासाठी समिती नेमली असून तिचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. समाजातील विविध घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.















Discussion about this post