जळगाव । जळगावसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि भीषण वादळी वाऱ्यांमुळे केळीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेली पिके डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे. शरद पवार यांनी या प्रश्नात थेट लक्ष घातल्यामुळे हतबल झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज सोमवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, अवकाळी पाऊस आणि पिकांच्या नुकसानीसह विविध कृषी विषयांवर पक्षाची सविस्तर भूमिका मांडली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील केळीसह उसाच्या नुकसानीकडे त्यांनी विशेषकरुन लक्ष वेधले. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतून पिकांच्या नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत.
या अहवालांमध्ये विशेषतः केळी आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांचे स्वतंत्र पथक संबंधित भागात पाठविण्यात आले होते. या पथकाने नुकसानीची पाहणी करून आपला अहवालही सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील भूमिका आणि सरकारकडे करण्यात येणाऱ्या मागण्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यासही वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी काढणीवर आलेल्या केळीच्या हजारो हेक्टरवरील केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चातून उभ्या केलेल्या बागा काही तासांच्या वादळात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक स्तरावरून समोर येत आहे. ऊस पिकालाही मोठा फटका बसल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे सांगत शरद पवार यांनी प्रशासनाने विलंब न करता पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या धोरणावर बोट ठेवले. “राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शेतीवरील संकट अधिक गंभीर होऊ नये यासाठी सरकारने सकारात्मक उपाययोजनांवर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे हीच सर्वात मोठी गरज आहे,” असे आवाहन त्यांनी सरकारला केले.















Discussion about this post