नवी दिल्ली । राजधानी दिल्लीत आज विरोधी पक्षांची मोठी एकजूट पाहायला मिळाली. आगामी राजकीय घडामोडी आणि संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला तब्बल २५ पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते, अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मात्र, या बैठकीकडे एआयडीएमके (AIADMK) आणि आम आदमी पार्टी (AAP) या दोन पक्षांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.
या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सपा प्रमुख अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीतील २५ पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते.
‘या’ ५ मुद्द्यांवर विरोधकांचे एकमत
बैठकीत केंद्र सरकारला विविध आघाड्यांवर घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली असून, खालील ५ प्रमुख मुद्द्यांवर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे:
१. एसआयआरच्या मुद्द्यावर सरन्यायाधीशांना पत्र लिहिले जाईल.
२. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
३. आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी.
४. आघाडीची बैठक दर दोन महिन्यांनी होते, पुढील बैठक हैदराबाद येथे होणार आहे.
५. संसदेच्या अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षनेत्यांच्या अध्यक्षतेखाली दररोज बैठक होईल.
इंडिया (INDIA) आघाडीची बैठक संपली असून या बैठकीत सर्वांनी आपली मते मांडली आणि त्यानंतर ५ मुद्द्यांवर एकमत झाले. एकत्र येऊन या मुद्द्यांवर एकत्र लढू, त्यावर काम करू आणि पुढे जाऊ, असे खर्गे म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतांची लूट आणि निवडणुकांमध्ये होणारी चोरी याविषयी भारताच्या सरन्यायाधीशांना (Chief Justice of India) एक पत्र पाठवण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. हे पत्र लवकरच सरन्यायाधीशांकडे सुपूर्द केले जाईल. त्याशिवाया देशाच्या शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व पक्षांनी एकमुखाने केली आहे. कारण नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षा देणाऱ्या लाखो तरुणांच्या भविष्याशी आणि विश्वासाशी जो खेळ झाला, त्याला शिक्षणमंत्रीच जबाबदार आहेत, असे हल्लाबोल खर्गे यांनी केला.
देशातील ढासळती आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनतेशी जोडलेल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक (All-party meeting) बोलवावी, अशी मागणी यावेळी इंडिया आघाडीने केली. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष यापुढे केवळ निवडणुकांसाठी नाही, तर दर दोन महिन्यांनी नियमितपणे एकत्र भेटत राहतील, यावर सर्वांचे एकमत झाले आहे. आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांमध्ये ताळमेळ (Coordination) राहावा, यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात रोज सकाळी बैठक घेतली जाईल, असेही खर्गे म्हणाले.















Discussion about this post