मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधानभवनात झालेल्या भेटीची जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेण्याची गरज नव्हती. या कृतीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून चुकीचा संदेश गेला असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “ज्या व्यक्तीने महाविकास आघाडीचे सरकार पाडले, त्या गद्दाराच्या दालनात जाऊन बैठक घेणे योग्य नाही. अशा कृतीमुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते.”
राऊत यांनी शरद पवार यांच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करत, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले. मात्र, पक्षाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातच घेण्यामागचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानभवनात किंवा परिसरात इतर अनेक ठिकाणी बैठक घेता आली असती, असेही त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राजकीय संकेत आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे सांगताना राऊत म्हणाले, “जर आम्ही अजित पवारांच्या दालनात बैठक घेतली असती, तर आमच्यावर महाविकास आघाडीविरोधात गेल्याचा आरोप झाला असता. त्यामुळे प्रत्येक घटक पक्षाने अशा बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे.”
दरम्यान, शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत जाणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. मात्र, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे १५ मिनिटे झालेल्या चर्चेत नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आता काँग्रेसकडून या घडामोडींवर काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post