मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने आज अतिशय मोठा कायदेशीर दिलासा दिला आहे. सन २००८ मधील बहुचर्चित रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने राज ठाकरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल मनसे प्रमुखांसाठी कायदेशीर आणि राजकीय आघाडीवर खूप मोठा विजय मानला जात आहे.
सरकारी पक्षाकडे ठोस पुराव्यांचा अभाव
२००८ मध्ये ऑल इंडिया रेल्वे भरती परीक्षेवेळी कल्याण परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय उमेदवार आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप करत भडकाऊ भाषण केले होते, असा आरोप फिर्यादी पक्षाने ठेवला होता. या चिथावणीखोर भाषणामुळेच मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले, असा पोलिसांचा दावा होता. या खटल्यात राज ठाकरे हे आरोपी क्रमांक १० होते.
या प्रकरणात सरकारी पक्षाने न्यायालयात अनेक पुरावे सादर केले. मात्र, राज ठाकरे यांचा या गुन्ह्यातील थेट सहभाग स्पष्ट करणारे आणि गुन्हा सिद्ध होईल असे कोणतेही ठोस व भक्कम पुरावे मांडण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. पुराव्यांच्या अभावामुळे राज ठाकरे यांना दोषी ठरविणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता जाहीर केली.
तब्बल १८ वर्षांनंतर प्रकरणाचा शेवट
या प्रकरणात एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा खटला प्रलंबित असतानाच यातील २ आरोपींचा मृत्यू झाला आहे. गेल्या १६ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. अखेर आज ठाणे न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे १८ वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईचा शेवट झाला असून मनसे वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.















Discussion about this post