जळगाव । राज्यभरात वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. खान्देशसह राज्यातील अनेक भागांत बुधवार, २७ मे ते २९ मेदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन दिवस, मध्य महाराष्ट्रात तीन दिवस तर विदर्भात चार दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले असून आता संभाव्य पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसानंतर छत्रपती संभाजीनगर येथे तापमानात १.४ अंश सेल्सियसने घट झाली. सोमवारी ४१.२ अंश असलेले तापमान मंगळवारी ३९.८ अंशांवर आले. त्यामुळे मराठवाड्यात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.
मात्र विदर्भात अद्यापही उष्णतेचा तडाखा कायम असून मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४६.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. तर नाशिक आणि सोलापूर शहरातील तापमान ४० अंशांच्या खाली राहिले.
हवामान विभागाने नागरिकांना मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे सांगण्यात आले आहे.















Discussion about this post