मुंबई । राज्यातील सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचे चिंताजनक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै 2026 या सात महिन्यांत राज्यभरात लाचखोरीचे 439 गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांच्या लाचेच्या व्यवहारांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
एसीबीच्या अहवालानुसार, लाच मागितलेल्या रकमेमध्ये पोलिस विभाग अव्वल असून या विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये 54.65 लाख रुपयांची लाच मागितल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर महसूल व भूमी अभिलेख विभागात 33.43 लाख रुपये, विक्रीकर विभागात 21.36 लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागात 19.22 लाख रुपये आणि पंचायत समितीशी संबंधित प्रकरणांमध्ये 11 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.
या सात महिन्यांच्या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या 439 प्रकरणांमध्ये एकूण 632 आरोपींना नामजद करण्यात आले असून, त्यामध्ये 109 दलालांचाही समावेश आहे. सरकारी अधिकारी आणि नागरिक यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करत लाचेचे व्यवहार घडवून आणण्यात या दलालांची भूमिका असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
एसीबीने भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्याचा दावा केला असला, तरी सरकारी यंत्रणांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी लाच मागितल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post