जळगाव । आज जळगाव जिल्ह्यात भाजपची जी ताकद दिसून येते, त्यामागे अनेक कार्यकर्त्यांचे कष्ट आणि त्याग आहे. मात्र, या पिढीतील नेत्यांचा विचार केला तर एकनाथ खडसे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय योगदानाचा गौरव केला.
एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गडकरी यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीचा आणि भाजपची संघटना उभारण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात भाजपचा विस्तार करण्यात खडसे यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले, असे गडकरी यांनी नमूद केले.
भाजपचा विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खडसे यांनी सातत्याने काम केले. पक्षाच्या अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे, विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणे आणि अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा उभे राहणे, ही त्यांची कार्यपद्धती पक्षासाठी महत्त्वाची ठरली. खडसे यांनी उभी केलेली कार्यकर्त्यांची मजबूत फळी, व्यापक जनसंपर्क आणि सामान्य नागरिकांमध्ये निर्माण केलेला विश्वास याचा भाजपला पुढील काळात मोठा फायदा झाला. त्यामुळे आज पक्षाची जी ताकद उभी राहिली आहे, त्यामध्ये खडसे यांचा वाटा दुर्लक्षित करता येणार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात विरोधी पक्षात असताना एकनाथ खडसे यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात सातत्याने संघर्ष केला. विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडताना केवळ भाषणबाजी पुरेशी नसते, तर त्यामागे अभ्यास, तयारी आणि जनतेच्या प्रश्नांबद्दलची तळमळ आवश्यक असते. खडसेंच्या विधिमंडळातील कामात ही बाब प्रकर्षाने दिसून आली, असे गडकरी यांनी सांगितले.पाणी, सिंचन, रोजगार, शेती आणि ग्रामीण विकास यांसारख्या प्रश्नांवर खडसे यांनी सातत्याने आवाज उठविला. जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रभावीपणे विधिमंडळात मांडण्याची त्यांची शैली आणि त्यासाठी केलेला संघर्ष उल्लेखनीय असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.
पदांपेक्षा संघटन उभारणीचे योगदान मोठे
एकनाथ खडसे यांनी राज्याच्या राजकारणात विविध महत्त्वाची पदे भूषविली. मात्र, त्यांचे योगदान केवळ पदांपुरते मर्यादित नसून भाजपची संघटना तळागाळात उभी करण्यासाठी त्यांनी केलेले काम हीच त्यांची खरी ओळख आहे, असे गडकरी यांनी म्हटले.आज भाजप यशाच्या शिखरावर असताना पक्षाच्या या वाटचालीत योगदान देणाऱ्या जुन्या पिढीतील नेत्यांना विसरता येणार नाही. त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गडकरी यांनी केलेल्या या गौरवामुळे त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतील योगदानाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.















Discussion about this post