नवी दिल्ली । नीट पेपरफुटी प्रकरणावरून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.
राहुल गांधी म्हणाले की, संसद हे विरोधकांचे नैसर्गिक व्यासपीठ आहे. या विषयावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र चर्चा होऊ दिली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, “धर्मेंद्र प्रधान हे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचे प्रतीक बनले आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवून सरकारने देशाला स्पष्ट संदेश द्यावा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.”
राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, “विद्यार्थी, तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणे हे माझे कर्तव्य आहे. आंदोलनादरम्यान मला मारहाण झाली, पण त्याची पर्वा नाही. लोकांच्या हक्कांसाठी आणखी संघर्ष करण्यासही मी तयार आहे,” असे वक्तव्य केले.
यावेळी त्यांनी पोलिसांबाबतही दावा केला. “मला ताब्यात घेत असताना काही पोलिसांनी कानात सांगितले की, ‘या सरकारला हटवा. आम्ही केवळ आदेशाचे पालन करत आहोत’,” असा दावा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, या आंदोलनादरम्यान राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली असून, या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे.















Discussion about this post