मुंबई । राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकाल आणि पेपरशी संबंधित आक्षेपांवरून सुरू असलेल्या वादाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित पेपरची पुनर्तपासणी करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहमती दर्शवल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.


विद्यार्थी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेली ही बैठक सुमारे पावणेदोन तास चालली. बैठकीनंतर बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले. आपल्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

पेपरफुटीच्या आरोपांची SIT चौकशी
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या पेपरशी संबंधित पेपरफुटीच्या आरोपांवरही सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची SITमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिल्याचे सांगण्यात आले.
तसेच या प्रकरणात पुढील आठ दिवसांत कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दिली.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पेपरची पुनर्तपासणी आणि पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी या दोन्ही मुद्द्यांवर सरकारकडून आश्वासन मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, MPSCच्या एकूणच कामकाजात सुधारणा करण्याच्या मुद्द्यावरूनही आता सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.















Discussion about this post