मुंबई: राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागून असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या थकीत हप्त्यांबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आणि पोटनिवडणुकांमुळे रखडलेला हा निधी आता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये शेवटचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर मार्चपासून कोणताही हप्ता मिळालेला नाही. काही महिलांच्या खात्यात तर जानेवारीपासूनच पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे अर्ज बाद झाला का, अशी चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, थकीत हप्ते एकत्र मिळणार का, याबाबत चर्चा रंगली आहे. काही महिलांना ५००० ते ६५०० रुपये मिळणार असल्याची चर्चा असली, तरी अधिकृतपणे याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते देण्याची तयारी सुरू आहे.
३० एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपल्यानंतर अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून आता निधी वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून, मंत्रिमंडळ बैठकीतही या विषयावर चर्चा होणार आहे.महिलांच्या खात्यात नेमके ३००० रुपये (मार्च-एप्रिल) जमा होणार की मे महिन्यासह ४५०० रुपये मिळणार, याबाबत अजूनही साशंकता आहे. काहींच्या मते केवळ मार्च महिन्याचाच हप्ता प्रथम दिला जाऊ शकतो.
दरम्यान, ई-केवायसी न केलेल्या किंवा निकषात न बसणाऱ्या सुमारे ५४ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तर १ कोटी ८९ लाख पात्र महिलांना पुढेही लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थी कमी झाल्यामुळे राज्य सरकारचे सुमारे १२०० कोटी रुपये वाचणार असल्याचेही समोर आले आहे. योजनेच्या पुढील हप्त्याबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.














Discussion about this post