मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे एकाचवेळी वर्षा बंगल्यावर दिसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांवर आता जयंत पाटील यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यांनी पूर्वनियोजित वेळ घेऊनच घेतली होती. वेळ पुढे गेल्यामुळे काही काळ प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील नगराध्यक्ष अपात्र ठरविण्याच्या प्रकरणाबाबत चर्चा केली.
पाटील म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्ष अपात्र ठरविण्यात आल्याचा विषय सांगितला. त्यावर त्यांनी माहिती घेऊन दोन दिवसांत कळवतो, असे आश्वासन दिले. या विषयावर नगरविकास मंत्र्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते उपलब्ध नसल्याने मी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.”
“मी हॉलमध्ये एकटाच होतो”
जयंत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर ते काही वेळ वर्षा बंगल्याच्या हॉलमध्ये बसून होते. त्यावेळी मुख्यमंत्री अन्य बैठकीत व्यस्त होते. “मी हॉलमध्ये एकटाच होतो. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल कधी आले किंवा ते कोणत्या कारणासाठी आले, याची मला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एनडीएमध्ये जाणार किंवा पक्षाच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याच्या वृत्तांचेही जयंत पाटील यांनी खंडन केले. “माझ्या भेटीचा आणि अशा कोणत्याही राजकीय चर्चेचा काहीही संबंध नाही. मी केवळ नगराध्यक्ष अपात्र ठरविण्याच्या विषयासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो होतो,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला असला, तरी राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष कायम आहे.















Discussion about this post