जळगाव | सातबारा उताऱ्यावरील नोंदणी दुरुस्तीसाठी १५ हजारांची लाच स्विकारतांना जळगाव जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणी संदर्भातील किंवा शासकीय दप्तरी नोंदीच्या कामासाठी भूकरमापक जितेंद्र पाटील याने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी केली. लाच मागितल्याचे निष्पन्न होताच, भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ठरलेली १५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने जितेंद्र पाटील याला रंगेहाथ पकडले.
जितेंद्र पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. जळगावात गेल्या काही दिवसांत लाचखोरीच्या एकापाठोपाठ एक घटना समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे एसीबीच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.














Discussion about this post