मुंबई । राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी १९८४ मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’बाबत अमृतसर येथील एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महाजन यांच्या विधानावरून महाविकास आघाडीने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला असून, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांची खंबीर पाठराखण केली आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे.
गिरीश महाजन नेमके काय म्हणाले होते?
दमदमी टकसालच्या एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात शीख अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या लष्करी कारवाईचा उल्लेख ‘काळा दिवस’ असा केला होता. “या कारवाईत अनेक शीख बांधव शहीद झाले,” असे म्हणत त्यांनी या घटनेची तुलना थेट अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दालीच्या हल्ल्याशी केली आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर इतिहासाचा संदर्भ देत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नेहरू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला.गांधींच्या नेतृत्वाखाली शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळख झाली. यामध्ये नेहरूंची कामगिरी मोठी होती. ती विसरता येणार नाही असे शरद पवार यांनी सुनावले.
“हा देशद्रोहाचा प्रकार, महाजनांची हकालपट्टी करा!” – संजय राऊत आक्रमक
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारला. राऊत म्हणाले,”देशाची अखंडता, एकता आणि सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या लष्करी कारवाईला ‘काळा दिवस’ म्हणणे म्हणजे देशद्रोहासारखे आहे. ही कारवाई देशाच्या हितासाठी होती आणि या मोहिमेचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार मंत्र्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी.” अशी मागणी केली
दरम्यान, एकीकडे विरोधकांकडून होणाऱ्या चौफेर हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांची जोरदार पाठराखण केली. मुख्यमंत्री म्हणाले, “गिरीश महाजन यांनी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. त्यांनी आपल्या भाषणातून शीख समाजाचा गौरव केला असून त्यांचे संपूर्ण भाषण हे समाजाप्रती आदराचे होते. नेहरू आणि मोदी यांच्या तुलनेचा इथे विषयच नाही, कारण दोघांचेही कार्य देशाला ठाऊक आहे. मात्र, काँग्रेसनं १९८४ मध्ये शीख समाजावर केलेला अत्याचार हा विसरता येणारा नाही. काँग्रेसच्या त्या कृत्याचा आम्ही जन्मभर निषेध करतच राहू.”















Discussion about this post